भरतपुर नावाचे गाव होते. त्या गावात माधवराव नावाचे शेतकरी होते. ते शेतात सतत राबत असत. त्यांना दोन मुले होती. एके दिवशी माधवरावांनी आपल्या मुलांना दोन-दोन रुपये दिले. मुलांना आनंद झाला. माधवराव म्हणाले, "मुलांनो, या पैशातुन तुम्ही घर भरुन जाईल अशी वस्तु आणू शकाल का ?"
"घर भरुन जाईल अशी वस्तु कशी आणायची, तेही एवढयाशा पैशांत ?" मुलांना प्रश्न पडला. त्यांना काही सुचेना. ती एका दुकानात गेली. तेथे त्यांना अनेक वस्तु दिसल्या. दोघांनी मिळूण खुप विचार केला. त्यांना एक कल्पना सुचली. दोघांनी मिळून एक पणती विकत घेतली. मुले घरी आली. संध्याकाळ झाली. त्यांनी पणतीत तेल घातले. कापसाची वात केली. पणती लावून ठेवली. तेवढयात माधवराव आले. त्यांनी पाहिले, सारे घर उजळून निघाले होते. "अरे वा ! कमालच केली तुम्ही !" माधवराव म्हणाले.
मुले म्हणाली, "बघा बाबा, आम्ही घर भरून जाणारी वस्तु आणली. "खरेच घरभर प्रकाश पसरला होता. दोन्ही मुलांनी एकत्रित विचार करुन कल्पकतेने आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधले, याचा माधवरावांना खुप आनंद झाला. त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलावले व शाबासकी दिली.
*** समाप्त ***